google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

…तर एकाच टर्ममध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील नितीश कुमार!

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पुन्हा एकदा भाजपाच्या वाटेवर असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले असताना नितीश कुमार पुन्हा एकदा आरजेडीला सोडून भाजपाशी हातमिळवणी करणार आहेत, अशी शक्यता वर्तविली जात आहे. बिहार विधानसभेत २४३ आमदारांपैकी केवळ ४५ आमदार आणि तिसऱ्या क्रमाकांचा पक्ष असूनदेखील नितीश कुमार एकाच टर्ममध्ये तिसऱ्यांदा किंगमेकरची भूमिका निभावताना दिसत आहेत. नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद तर भाजपाच्या दोन नेत्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे झाले तर एकाच टर्ममध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा विक्रम नितीश कुमार रचतील.

ओबीसी कुर्मी समाजाचे नेते असलेल्या नितीश कुमार यांनी ३ मार्च २००० साली पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पण अवघ्या सात दिवसांत १० मार्च रोजी त्यांना विश्वास प्रस्तावावर बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता.

त्यानंतर २००५ साली विधानसभा निवडणुकीत मोठा विजय प्राप्त करून नितीश कुमार यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. पुढे २०१० साली नितीश कुमार यांच्या पक्षाला बहुमत मिळू शकले नाही. त्यामुळे भाजपाच्या पाठिंब्यावर त्यांनी सरकार स्थापन केले आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आरजेडीचे या निवडणुकीत पानिपत झाले. त्यांना केवळ २२ जागा मिळू शकल्या.

मात्र २०१३ साली भाजपाने गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून जाहीर केल्यानंतर नितीश कुमार यांनी भाजपाशी नाते तोडले. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभव स्वीकारून त्यांनी जीतन मांझी यांना मुख्यमंत्रीपदाची खूर्ची दिली. मात्र काही महिन्यातच मांझी यांना बाजूला सारून ते चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले.

२०१५ साली विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर (आरजेडी) आघाडी केली आणि निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र दोनच वर्षात २०१७ साली त्यांनी आरजेडीशी केलेली आघाडी तोडून भाजपाशी युती केली आणि सहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

२०२० साली जेडीयू आणि भाजपा एकत्रितपणे विधानसभा निवडणुकांना सामोरे गेले. या निवडणुकीत जेडीयू पक्ष तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. मात्र तरीही भाजपाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद देऊ केले. ते सातव्यांदा मुख्यमंत्री झाले. मात्र पुन्हा एकदा दोनच वर्षात २०२२ साली त्यांनी भाजपाशी काडीमोड घेऊन पुन्हा आरजेडीशी आघाडी केली आणि आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याही घटनेला आता दोन वर्ष होत आली आहेत. नितीश कुमार पुन्हा आरजेडीला सोडून भाजपाला जवळ करण्याच्या मार्गावर आहेत.

२०१३ पासून ते २०२३ या दहा वर्षांत नितीश कुमार यांनी दोन वेळा भाजपा आणि आरजेडीशी युती आणि आघाडी केली. त्यामुळे दोन्ही पक्षांनी त्यांच्यावर प्रखर टीका केलेली आहे. भाजपाने तर त्यांना पलटू कुमार असे नाव दिले होते. मात्र तोच भाजपा आता पुन्हा एकदा नितीश कुमार यांना नवव्यांदा मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी मदत करणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!