T20 world cup : रोमांचक विजयासह टीम इंडिया फायनलमध्ये
वानखेडेच्या ऐतिहासिक मैदानावर टीम इंडियाने पुन्हा एकदा विजयाचा झेंडा फडकवला आहे. टी-20 विश्वचषक 2026 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने बलाढ्य इंग्लंडचा 7 धावांनी धुव्वा उडवत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. संजू सॅमसन, ईशान किशन आणि शिवम दुबे यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारताने 253 धावांचा डोंगर उभा केला होता, ज्यासमोर इंग्लंडकडून जेकब बेथेल हा शेवटपर्यंत एकटा नडला. इंग्लंडचा संघ 246 धावांत गारद झाला. आता टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.
सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने 7 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने केवळ 9 धावा केल्या. पण, यानंतर संजू सॅमसन आणि ईशान किशन यांनी डाव सावरत भारतीय संघाला शंभरी पार करून दिली. ईशान किशनने आक्रमक फलंदाजी करत 18 चेंडूत 39 धावा केल्या.
दुसऱ्या बाजूला संजू सॅमसनने तांडव घातला आणि अर्धशतक झळकावले. तो 42 चेंडूत 7 चौकार आणि 7 षटकारांच्या जोरावर 89 धावा करून बाद झाला. सॅमसन बाद झाल्यानंतर शिवम दुबेने तुफानी फलंदाजी करत 25 चेंडूत 43 धावा ठोकल्या. मात्र, दुर्दैवाने तो धावबाद झाला. दुसरीकडे सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने 6 चेंडूत 11 धावा करून विकेट गमावली. यानंतर तिलक वर्माने अवघ्या 7 चेंडूत 3 षटकारांसह 21 धावांची झंझावाती खेळी केली, तर हार्दिक पांड्याने 12 चेंडूत 27 धावा करत संघाची धावसंख्या वेगाने वाढवली. या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 7 बाद 253 धावांचा प्रचंड डोंगर उभारला.
254 लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात पण धक्कादायक झाली. हार्दिक पांड्याने दुसऱ्या षटकांच्या पहिल्याच चेंडूवर भारताला पहिलं यश मिळवून दिलं, त्याने फिल साल्टला आऊट केलं. तो फक्त पाच धावा करू शकला. त्यानंतर हॅरी ब्रूकही मोठी खेळी करू शकला नाही, तो 7 धावा करून जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर अक्षर पटेलकडे झेल देत माघारी परतला. जोस बटलर मात्र चांगल्या लयीत दिसत होता, पण त्याची खेळीही फार काळ टिकली नाही. 25 धावांवर असताना फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने त्याला बोल्ड करत इंग्लंडला मोठा धक्का दिला. यानंतर टॉम बॅन्टनने (17) अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर दोन गगनचुंबी षटकार ठोकत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षर पटेलनेच त्याला लगेच बाद करत इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. जेकब बेथेल एकटा नडला, त्याने आधी अवघ्या 19 चेंडूमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने 45 चेंडूत शतक ठोकले, पण तो संघाला विजय मिळून देऊ शकला नाही.



