
मुंबईत वंचितसोबत आघाडी होताच हर्षवर्धन सपकाळ काय काय म्हणाले?
Harshwardhan Sapkal: देशातील पुरोगामी विचारांना आणि संविधानिक मूल्यांना रुजवण्यासाठी संविधानवादी आणि मनुवादी जी लढाई आहे यामध्ये नेमकेपणानं संविधानवाद्यायांना एकत्रित करून आम्ही पुढे जात आहोत. संविधानिक मूल्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही तडजोड करणार नाही ही ठाम भूमिका ही काँग्रेसची आणि अर्थातच वंचित बहुजन आघाडीची असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.
मुंबई मनपासाठी काँग्रेस आणि वंचित आघाडी झाली असून वंचित 62 जागा लढवणार आहे. ही आजची जी आघाडी आहे ही सत्तेसाठी नाही तर ही विचारांची असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नैसर्गिक आघाडी आमची होत असल्याचे ते म्हणाले. सपकाळ यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडीच्या सर्व नेतृत्वाला मी धन्यवाद देतो की. आज काळाची गरज होती. आज युगधर्म आहे की संविधानवाद्यांनी एकत्रित आलं पाहिजे. मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचित हे सोबत निवडणुकीला एक दिलानं, एका विचारानं आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आज मुंबईची घोषणा आघाडीची आम्ही करत आहोत इतर उर्वरित 28 ठिकाणी आमची चर्चा सुरू आहे आणि सकारात्मक स्वरूपात होईल. नगरपालिकेमध्ये आम्ही काही ठिकाणी सोबत लढलो. मात्र नगरपालिकेमध्ये सोबत लढत असताना समविचारी म्हणून वंचितच्या आम्ही सोबत आलो. आज मात्र आम्ही समविचारीवरून आता आम्ही पुढे आलो आहोत आणि आजपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष मित्र पक्ष म्हणून राहतील आणि आता आम्ही मित्र पक्ष आहोत. आतापासून एक नवीन अध्यायाला सुरुवात आम्ही करत आहोत. ते म्हणाले की, आज काँग्रेस स्थापना दिवस आहे आणि आज काँग्रेस स्थापना दिवसाच्या निमित्ताने योगायोग म्हणजे आज युतीची घोषणा होत आहे. यातही बरंच काही दडलं आहे. आगामी काळात या आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि पर्यायाने भारतात एक परिवर्तन झाल्याचा आढळून येईल, असे ते म्हणाले. जागेपेक्षा विचारांना आम्ही प्राधान्य देत आहोत.





