
‘गोमंतकीय पाकिस्तानी नाहीत, मोफत पाणी योजना पुन्हा सुरू करा’
मडगाव:
केंद्र सरकार पाकिस्तानला “धडा शिकवण्यासाठी” पाणी बंद करण्याची गर्जना करत आहे, पण दुसरीकडे गोवा सरकार गोमंतकीयांसाठीची मोफत पाणी योजना बंद करून त्यांना शिक्षा करत आहे ही बाब अत्यंत विरोधाभासी आहे. गोमंतकीय पाकिस्तानी नाहीत हे सरकारने लक्षात ठेवावे. आम्ही या देशाचे कायदे पाळणारे नागरीक आहोत, आम्हाला सन्मान हवा आहे, सूड नव्हे. सरकार जर मोठमोठे इव्हेंट्स करण्यासाठी खर्च करू शकते, तर गोमंतकीयांसाठी मूलभूत कल्याणकारी योजना चालू ठेवणेही सरकारला शक्य झालेच पाहिजे, असे मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी म्हटले आहे.
गोवा सरकारने दर महिन्याला दर कुटुंबासाठी १६,००० लिटर मोफत पाणी देण्याची योजना बंद करण्याचा नुकताच घेतलेला निर्णय अत्यंत निराशाजनक आणि गोमंतकीयांचा विश्वासघात करणारा आहे. वाढत्या जीवनखर्चामुळे त्रस्त हजारो कुटुंबांना या योजनेमुळे काही प्रमाणात दिलासा मिळत होता. योग्य स्पष्टीकरण न देता ही योजना तडकाफडकी बंद करणे म्हणजे जनविरोधी निर्णय आहे, असा आरोप प्रभव नायक यांनी केला.
सदर मोफत पाणी योजना अचानक रद्दबातल केल्यामुळे सरकारच्या प्राधान्यक्रमांबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. योग्य प्रशासनाची जबाबदारी कुणाकडे आहे? पारदर्शकता कुठे आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सामान्य गोमंतकीयांविषयी सहानुभूती कुठे आहे? असे सरळ सवाल प्रभव नायक यांनी उपस्थित केले आहेत.
मडगावचो आवाज कडून आम्ही मोफत पाणी योजना त्वरित पुन्हा सुरू करण्याची मागणी करतो. गोमंतकीयांनी या अन्यायकारक निर्णयाविरोधात आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहनही प्रभव नायक यांनी केले. पाणी ही चैन नाही, ती जीवनावश्यक गोष्ट आहे. ती हिरावणे म्हणजे मूलभूत हक्कांचा अपमान आहे, असा दावा प्रभव नायक यांनी केला.
ही फक्त लिटर आणि पैशांची बाब नाही. ही मूल्ये, वचने आणि जबाबदारीची बाब आहे. जर सरकारने याच मार्गाने पुढे चालत राहायचे ठरवले, तर गोमंतकीयांचा रोष त्यांना सहन करावा लागेल, असा इशारा प्रभव नायक यांनी दिला.