गोवा

‘मडगांवचो आवाज’ साजरे करणार ‘अस्मिताय वर्ष’

'ओपिनीयन पोल'च्या हिरक महोत्सवानिमित्त वर्षभर कार्यक्रम

मडगांव: गोव्याची वेगळी ओळख, भाषा व संस्कृती निर्णायकपणे जपणाऱ्या १९६७ च्या ऐतिहासिक ओपिनीयन पोलला ६० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मडगांवचो आवाज १६ जानेवारी २०२६ ते १६ जानेवारी २०२७ या कालावधीत “अस्मिताय वर्ष” साजरे करणार आहे. या वर्षभराच्या उपक्रमातून जनमत कौल चळवळीतील दिग्गज तसेच गोव्याच्या अस्मितेसाठी ठामपणे उभे राहिलेल्यांच्या कुटुंबीयांचा गौरव केला जाईल, अशी माहिती युवा नेते प्रभाव नायक यांनी दिली.

अस्मिताय वर्षांतर्गत वर्षभर लोकाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून त्यात सार्वजनिक चर्चा, परिसंवाद, स्पर्धा व विविध सांस्कृतिक व लोकसहभागी कार्यक्रमांचा समावेश असेल. या उपक्रमांद्वारे ऐतिहासिक जनमत कौलाची आठवण करून देत त्याचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ रोजी ६० वा जनमत कौल दिन साजरा करण्यात येणार असून, या दिवशी ओपिनीयन पोल चळवळीतील एक अग्रणी अ‍ॅड. उदय भेंब्रे यांच्या हस्ते विशेष स्मरणिका पोस्टरचे अनावरण करण्यात येईल, अशी माहिती प्रभव नायक यांनी दिली.

यावेळी “जनमत कौल” चळवळीतील हयात असलेल्या दिग्गजांचा गोव्याची ओळख टिकवून ठेवण्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल सन्मान करण्यात येणार आहे. सत्कारार्थी मान्यवरांमध्ये अ‍ॅड. उदय भेंब्रे, प्रा. श्याम वेरेंकर, एन. शिवदास, अरुणा तेलंग, निर्मला सावंत, सदानंद कणेकर, तोमाझिन्हो कार्दोज आणि स्मृती अवदी यांचा समावेश आहे.

जनमत कौल हा केवळ एक राजकीय निर्णय नव्हता, तर गोव्याच्या संस्कृती, मूल्ये आणि लोकशाही आत्म्याचे प्रतिबिंब असलेली लोकचळवळ होती. या दिग्गजांच्या त्याग व ठाम भूमिकेमुळेच गोव्याची स्वतंत्र ओळख अबाधित राहिली, असे प्रभव नायक यांनी नमूद केले. तसेच या ऐतिहासिक चळवळीत आपले पणजोबा नरसिंह नायक आणि आजोबा अनंत ऊर्फ बाबू नायक यांचे योगदान होते, याचा आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

अस्मिताय वर्षाअंतर्गत होणाऱ्या उपक्रमांचा उद्देश युवकांमध्ये जनजागृती करणे, गोव्याच्या अस्मितेवर व्यापक सार्वजनिक संवाद घडवून आणणे आणि भविष्यात राज्याची सांस्कृतिक, भाषिक व सामाजिक वीण जपण्यासाठी सामूहिक जबाबदारीची भावना निर्माण करणे हा आहे. अस्मिताय वर्ष हे खऱ्या अर्थाने लोकचळवळ बनवण्यासाठी नागरिकांनी व संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मडगांवचो आवाजतर्फे प्रभाव नायक यांनी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!