google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘…तर ‘स्मार्ट’ मीटरचा अट्टाहास का?’

राज्यातील विजेची समस्या अद्याप पूर्णपणे सुटलेली नाही. दुसरीकडे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. असे असताना सरकार स्मार्ट मीटर ग्राहकांच्या माथी मारण्याच्या तयारीत आहे. स्मार्ट मीटर आणायचेच होते तर डिजिटल मीटरचा घाट सरकारने का घातला होता, असा सवाल करीत आम आदमी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष सुरेल तिळवे यांनी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर टीका केली.

पक्षाच्या कार्यालयात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सुनील सिंगणापुरकर उपस्थित होते. गोमंतकीय माणूस अगोदरच विजेच्या वाढीव बिलांमुळे त्रासात पडलेला आहे. ही बिले वेळेत येत नसल्यामुळेही जनता मन:स्‍ताप सहन करीत आहे. आता तर सरकार पदपथांवरील दिव्यांचा खर्चही सामान्य लोकांच्या खिशातून वसूल करणार आहे.

प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे भूत सरकार लोकांच्या माथी मारणार आहे. त्या मीटरसाठीची 7 हजार रुपयांची रक्कम लोकांच्या बिलामधून वसूल केली जाणार आहे. राज्यात 6.5 लाख डिजिटल मीटरचे ग्राहक आहेत.

जर स्मार्ट मीटरच बसवायचे होते, तर डिजिटल मीटर कशासाठी बसविले, असा सवाल तिळवे यांनी उपस्‍थित केला. डिजिटल मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसवायचे झाल्यास 450 कोटी रुपये खर्च येणार आहे. हा खर्च सामान्यांच्या खिशातून काढला जाणार आहे, असा दावाही त्‍यांनी केला.

राज्य सरकारने वीज वाहने खरेदी करण्यासाठी सवलत योजना आणली होती. त्यानुसार राज्यात हजारो वाहने लोकांनी खरेदी केली. परंतु अद्याप एकाही वाहनधारकाला ही सवलत मिळालेली नाही, याकडे सिंगणापुरकर यांनी लक्ष वेधले.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!