
‘वाचन म्हणजे घरबसल्या जगप्रवास करणे’
पणजी:
‘‘आजपर्यंत वाचत असताना मला जे – जे नवं आढळलं ते मी त्या – त्या वेळी त्यांचा विचार करीत राहिले. वाचन म्हणजे घरबसल्या जगप्रवास करणे आहे. एखादं प्रवासवर्णन वाचलं तर आपण देश किंवा परदेश फिरून येतो. जगाचा इतिहास, भुगोल, संस्कृती कळते. एखादं पुस्तक आपल्याला खूप आवडलं की नशा चढते. मला आत्मचरित्रे फार आवडतात. आजपर्यंत दोनशे पेक्षा जास्त आत्मचरित्रे मी वाचलेली आहे. सद्या मी अमोल पालेकर यांचं आत्मचरित्र वाचत आहे. आवडता प्रकार वाचला कि प्रसन्नता वाटू लागते’’, असे प्रतिपादन नामवंत लेखिका आणि चित्रपट निर्माती ज्योती कुंकळकर यांनी काढले.
‘विद्यार्थी लेखकांच्या भेटीला’ या उपक्रमाचे आयोजन मुरगांव एज्याकेशन सोसायटीच्या वसंत जोशी कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड कॉमर्स यांच्या कोंकणी विभाग व गोवा कोंकणी अकादेमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजन केले होते.
प्रा. सत्यवान नायक आणि शिक्षकां समवेत ५० विद्यार्थ्यांनी ज्योती कुंकळकर आणि संपदा कुंकळकर यांच्या माशेल – तिवरे येथील निवासस्थानी भेट देवून सत्यवान नायक यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी संपदा कुंकळकर म्हणाल्या, ‘‘माणूस हा कोणत्याही क्षेत्रातला असला तरी प्रत्येकाला वाचन हे खूप महत्वाचे आहे. फक्त लेखक वा संशोधकांनीच वाचले पाहिजे असे नाही. वाचलेले ज्ञान कधीच फुकट जात नाही. त्या शिवाय करियर करताना शिस्त आणि व्यवस्थापनही खूप गरजेचे आहे.’’
ज्योती कुंकळकरने बालकलाकार ते आजपर्यंतचा प्रवास सांगितला. स्वागत आणि प्रास्ताविक प्रा. सत्यवान नायक यांनी केले तर सुत्रसंचालन आणि आभार नलीशा वेळीप यांनी केले. तर पाहुण्यांची ओळख लक्षता म्हातोंडकर यांनी केली.