google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्र

अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, निवडणूक आयोगाचा निकाल

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. त्यामुळे खरा पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आता लागला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी महायुतीबरोबर जात उपमुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला. त्यांच्याबरोबर काही आमदारही गेले. तसंच, जवळपास ७ मंत्र्यांनी त्यांच्याबरोबर मंत्रिपदाची शपथही घेतली. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही फूट पडल्याने हे प्रकरणही निवडणूक आयोगाकडे गेले. गेल्या सहा महिन्यांपासून निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस फुटीचं प्रकरण प्रलंबित होतं. गेल्या सहा महिन्यांत याप्रकरणी १० सुनावण्या निवडणूक आयोगाकडे झाल्या. या प्रत्येक सुनावणीत शरद पवार जातीने हजर होते.

अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आगोयाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. अखेर अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह आणि पक्षनाव देण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी राज्यसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पक्षचिन्ह आणि पक्षनावासाठी तीन पर्याय सुचवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

“निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय. देशातील जवळपास सर्वच संविधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली असल्याने तर्कहीन निर्णय देऊन तांत्रिक कारणे पुढे केली गेलेली सकृतदर्शनी दिसत आहे. या निकालाचा सविस्तर अभ्यास करुन आम्ही त्यावर भाष्य करू. या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून देशाचे सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!