
डॉ. मिलिंद न. जोशी यांच्या चार पुस्तकांचे प्रकाशन
मुंबई :
लेखक डॉ. मिलिंद न. जोशी यांच्या चार नव्या पुस्तकांचा अनौपचारिक प्रकाशन सोहळा नुकताच विलेपार्ले येथे उत्साहात पार पडला. ज्येष्ठ साहित्यिक अशोक बेंडखळे यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन झाले. तर ज्येष्ठ पत्रकार अशोक पानवलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या वेळी डॉ. जोशी यांच्या ‘भ्रमंती साठीनंतरची’ भाग १ व २ (प्रवासवर्णन), ‘आनंद संचित’ (काव्यसंग्रह) आणि ‘हलकं फुलकं तरीही बोलकं’ (नर्मविनोदी लेखसंग्रह) या चार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. ही पुस्तके सहित प्रकाशनने प्रकाशित केली आहेत.
प्रकाशन सोहळ्यात अशोक बेंडखळे यांनी डॉ. जोशी यांच्या लेखनातील निरीक्षणशक्ती, अनुभवसंपन्नता आणि वाचकाशी सहज नाते जोडणाऱ्या शैलीचे कौतुक केले. अशोक पानवलकर यांनी विविध साहित्यप्रकारांतील डॉ. जोशी यांच्या सातत्यपूर्ण लेखनाचा गौरव करत त्यांच्या साहित्यनिर्मितीतील वैविध्य अधोरेखित केले.
पुस्तकांचे प्रस्तावनाकार अशोक पानवलकर, रामदास कामत आणि प्रसाद कुळकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रवासवर्णनातील अनुभवसमृद्धता, ‘आनंद संचित’मधील काव्यसंवेदना आणि ‘हलकं फुलकं तरीही बोलकं’ या लेखसंग्रहातील सहज, मिश्कील आणि आशयगर्भ लेखनशैली यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला.







