![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230121_160852-780x470.jpg)
प्रशासनाच्या नाकावर टिच्चून कोयना धरणात कुणी बांधलं हॉटेल?
सातारा ( महेश पवार) :
महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात जावली तालुक्यातील मुनावळे येथे कोयना धरणाच्या संपादित जमिनीत नव्हे तर चक्क धरणात वन विभाग तसेच जलसंपदा विभागाचे सर्व नियम डावलून कोणाच्या वरदहस्ताने हॉटेल बांधले ?असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2023/01/img-20230121-wa00192186734341578439491-1024x576.jpg)
जावली तालुक्यातील मुनावळे हे गाव वन विभागाच्या बफर झोन , कोरझोन , ग्रीन झोन मधे येत असून याठिकाणी कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी नसताना देखील बोट क्लब सुरू असून याठिकाणी कोयना धरणासाठी अधिग्रहण केलेल्या जमिनीवर कोयना धरण व्यवस्थापनाच्या नाकावर टिच्चून चक्क धरणात बेकायदेशीर बांधकाम करून हॉटेल बांधले एवढ्यावर न थांबता थेट धरणाच्या पाण्यात मोटरा टाकून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू आहे . इतकेच नव्हे तर याठिकाणी धरणाच्या पाण्यात शौचालयांचे पाणी सोडून येथील जैवविविधतेला बाधा पोहचवली जात असताना देखील प्रशासन गंधारीच्या भूमिकेत का? नेमकी कोणाच्या आशिर्वादाने कोयना धरणात बेकायदेशीर बांधकामे करुन हॉटेल व्यवसाय सुरू आहे ,असा सवाल जनमानसामध्ये उपस्थित होत आहे .
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कोयनेच्या खोऱ्यात बेकायदेशीर बांधकामे वाढली, असल्याची जोरदार चर्चा असून , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागातील विकास हा पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर करणार असल्याची घोषणा केल्यानंतर ,कोयना धरण क्षेत्रात धनदांडग्यांनी स्थानिकांना हथाशी धरून नियम धाब्यावर बसवत बेकायदेशीर बांधकामे करुन परिसरातील निसर्ग सौंदर्याला बाधा पोहचवली जात आहे . यामुळे जिल्हा प्रशासनान आणि जिल्हाधिकारी यांनी वेळीच लक्ष घालून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी या मागणीला जोर धरू लागला आहे .