google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

Axis बँकेने केला 5000 शाखांचा टप्पा पार…

भारतातील खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी एक ऍक्सिस बँकेने गुजरातच्या अहमदाबादमध्ये आपली ५००० वी शाखा सुरु करून एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. गुजरातचे माननीय मुख्यमंत्री श्री. भूपेंद्रभाई पटेल यांच्या हस्ते, ऍक्सिस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमिताभ चौधरी आणि ऍक्सिस बँकेचे ग्रुप एक्झिक्युटिव्ह व प्रमुख – ब्रँच बँकिंग, रिटेल लायबिलिटीज व प्रॉडक्ट्स, श्री. रवी नारायणन यांच्या उपस्थितीत ऍक्सिस बँकेच्या ५०००व्या शाखेचे उदघाटन करण्यात आले. विविध विभागांमधील ग्राहकांना बँकिंग सेवासुविधा सहज उपलब्ध करवून देण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरून ऍक्सिस बँकेने आज देशभरात विविध ठिकाणी अजून १०० नव्या शाखा सुरु केल्या आहेत.



ऍक्सिस बँकेची (त्यावेळी ही बँक युटीआय बँक म्हणून ओळखली जात होती) पहिली शाखा २९ वर्षांपूर्वी १९९४ साली अहमदाबाद शहरातच सुरु करण्यात आली होती, त्यामुळे ५००० व्या शाखेचा शुभारंभ देखील याच शहरात होत आहे याला अनन्यसाधारण महत्त्व दिले जात आहे. पहिल्या शाखेचे उदघाटन देशाचे माननीय माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते करण्यात आले होते.


ऍक्सिस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमिताभ चौधरी यांनी उदघाटन प्रसंगी सांगितले, “ऍक्सिस बँकेसाठी हा विशेष महत्त्वाचा टप्पा आहे. अहमदाबादमध्ये पहिली शाखा सुरु करण्यापासून आज त्याच शहरात ५०००वी शाखा सुरु करून आम्ही वृद्धी व प्रगतीचे एक चक्र पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात आम्ही देशभरात, महानगरे व शहरांबरोबरीनेच गावे, डोंगराळ भाग, देशाच्या सीमांजवळ आणि काही अतिशय दुर्गम भागांमध्ये देखील आम्ही हजारो शाखा सुरु केल्या आहेत. आमची उत्पादने, सेवासुविधा आम्ही ज्यांना पुरवू इच्छितो अशा भारताच्या जवळ आम्ही आमच्या शाखांमार्फत पोहोचू शकलो आहोत. आमची प्रत्येक नवी शाखा म्हणजे आर्थिक वृद्धी, आर्थिक समावेश व समुदायांचे सक्षमीकरण करून असंख्य भारतीयांच्या जीवनाचा एक भाग बनून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने उचललेले पुढचे पाऊल आहे असे आम्ही मानतो.”


३० जून, २०२३ च्या आकडेवारीनुसार, ऍक्सिस बँकेच्या देशभर पसरलेल्या, मजबूत नेटवर्कमध्ये ४,९४५ शाखा, ९,४३४ एटीएम आणि ६,३१७ रिसायकलर्सचा समावेश आहे. त्यांच्या जवळपास २९% शाखा महानगरांमध्ये आहेत तर २३% शहरी भागांमध्ये, ३१% निमशहरी भागांमध्ये आणि १७% शाखा ग्रामीण भागांमध्ये आहेत. निमशहरी आणि ग्रामीण भागांमध्ये जास्तीत जास्त प्रसार व विस्तार करण्यासाठी, भारत बँकिंगचे एक अनोखे मॉडेल उभारण्यावर ऍक्सिस बँकेने भर दिला आहे. आजवर बँकिंग सेवासुविधांपासून वंचित राहिलेल्यांना बँकिंग सेवांचा लाभ अगदी सहजपणे घेता यावा यासाठी ऍक्सिस बँकेने २,२५० भारत बँकिंग शाखा आणि ६१,८०० कॉमन सर्व्हिस सेंटर – व्हिलेज लेव्हल आंत्रप्रिन्युअर्स (व्हीएलई) तैनात केले आहेत.

ऍक्सिस बँकेचे ग्रुप एक्झिक्युटिव्ह व प्रमुख – ब्रँच बँकिंग, रिटेल लायबिलिटीज व प्रॉडक्ट्स, रवी नारायणन यांनी सांगितले, “ऍक्सिस बँकेने एक ऐतिहासिक टप्पा गाठल्याचा आनंद आम्ही साजरा करत आहोत, आम्हा सर्वांसाठी ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. ५०००व्या शाखेची सुरुवात विश्वास, बांधिलकी, कार्यनिष्ठा आणि उत्कृष्टता यांच्यासह आम्ही करत असलेली वाटचाल दर्शवते. आम्हाला हे घोषित करताना आनंद होत आहे की, आज आम्ही देशात इतर वेगवेगळ्या ठिकाणी अजून १०० पेक्षा जास्त नवीन शाखा सुरु करून जास्तीत जास्त ग्राहकांना त्यांच्या जवळपास बँकिंग सेवासुविधा उपलब्ध करवून देत आहोत. जनशक्ती व डिजिटायझेशनच्या बळावर आम्ही यापुढील वाटचाल करत राहू, आमच्या बँकिंग सेवासुविधांमधून ग्राहकांच्या अपेक्षांपेक्षा सरस कामगिरी करू.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!