अर्थमत/ टेक्नॉलॉजी

‘सोन्याचे दर निर्धारीत करण्यामधील विश्वासार्हता जपली गेली पाहिजे’

भारतातील सोन्याच्या दर निर्धारणामध्ये उदयास येत असलेल्या काही पद्धती प्रस्थापित निकषांपासून दूर जात असून, त्यामुळे देशातील सोन्याच्या व्यापाराची दीर्घकाळ टिकून असलेली विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते असा इशारा मलबार ग्रुपचे अध्यक्ष एमपी अहमद यांनी दिला आहे.


ते म्हणाले की सोन्याचे दर ठरविण्यासाठी तीन महत्त्वाचे घटक असतात : आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोन्याचे दर, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचा विनिमय दर आणि आयात शुल्क. सीमाशुल्क ठराविक कालावधीसाठी स्थिर असले तरी जागतिक दरांतील चढउतार आणि चलन विनिमयातील बदल यांमुळे दररोज दरांमध्ये बदल वा सुधारणा करणे आवश्यक ठरते.


परंपरेनुसार, सोन्याचे दर व्यापार संघटनांकडून पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने निश्चित केले जातात आणि सकाळी 9:30 वाजण्यापूर्वी प्रकाशित केले जातात. दिवसासाठी निश्चित केलेले दर केवळ अत्यंत अपवादात्मक बाजार अस्थिरतेच्या परिस्थितीतच बदलले जातात.


मात्र, एम.पी. अहमद यांनी नमूद केले की काही प्रसंगी व्यापाऱ्यांचा एक गट प्रस्थापित यंत्रणेला बगल देत, कोणतेही स्पष्ट कारण ग्राहकांना न देता, मनमानी पद्धतीने दर वाढवत आहे. अशा प्रकारच्या प्रथा या क्षेत्रातील विश्वास कमी करू शकतात आणि ग्राहक, गुंतवणूकदार तसेच उद्योगातील भागधारकांमध्ये चिंता निर्माण करू शकतात असा इशारा त्यांनी दिला. व्यापाराची प्रामाणिकता धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही कृतींपासून सर्व संबंधितांनी दूर राहावे असे त्यांनी आवाहन केले आहे.


ते पुढे म्हणाले की मलबार गोल्ड अँड डायमंड्ससाठी ग्राहकांचे हितसंबंध हा सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे आणि सर्व व्यावसायिक व्यवहार पारदर्शकता व न्याय्यतेच्या तत्त्वांवर आधारित असले पाहिजेत. तसेच, राज्याराज्यांमधील दरातील तफावत दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कंपनीच्या ‘वन इंडिया वन गोल्ड रेट’ उपक्रमाचा त्यांनी उल्लेख केला. देशभरात करांचे दर समान असल्याने आणि सोन्याचा दर आंतरराष्ट्रीय निकषांशी जोडलेला असल्यामुळे, संपूर्ण देशात सोन्याची विक्री एकसमान दरानेच झाली पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!