अर्थमत/ टेक्नॉलॉजी

‘एआयच्या वेगवान प्रगतीचे परिणाम हाताळण्यास जग तयार नाही’

OpenAIच्या मुख्य शास्त्रज्ञाचा इशारा

नवी दिल्ली :कृत्रिमबुद्धिमत्तेच्या (AI) क्षमतेत होत असलेली झपाट्याने वाढ भविष्यात गंभीर धोके निर्माण करू शकते. एआयच्या वेगवान प्रगतीच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी जग अद्याप तयार नसल्याची चिंता OpenAIचे मुख्य शास्त्रज्ञ याकुब पाचोकी यांनी व्यक्त केली आहे. एआयच्या विकासाचा वेग कायम ठेवताना त्याच वेळी त्याच्या सुरक्षिततेसाठी अधिक कठोर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पाचोकी यांनी ‘An Alien Mind’ या शीर्षकाच्या लेखातून एआयच्या भविष्यातील वाटचालीबाबत चिंता व्यक्त केली. सध्याच्या वेगाने एआयची प्रगती सुरू राहिल्यास आगामी काही वर्षांत एआय प्रणालींच्या क्षमतेत मोठी झेप पाहायला मिळू शकते. एवढेच नव्हे, तर एआय प्रणाली स्वतःच्या पुढील विकासाला चालना देण्यात अधिकाधिक भूमिका बजावू शकतात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

‘रिकर्सिव्ह सेल्फ-इम्प्रूव्हमेंट’चा धोका

एआयच्या भविष्यातील विकासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘रिकर्सिव्ह सेल्फ-इम्प्रूव्हमेंट’ (RSI). या प्रक्रियेत एआय प्रणाली स्वतःच्या क्षमतांमध्ये सुधारणा करण्याच्या प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावू शकतात. सध्याची प्रगती कायम राहिल्यास अशा प्रकारच्या एआय विकासाची शक्यता वाढत असल्याचे पाचोकी यांनी म्हटले आहे.

एआयचा वापर आता केवळ मजकूर किंवा चित्रनिर्मितीपुरता मर्यादित राहिलेला नाही. वैज्ञानिक संशोधन, संगणक आणि डिजिटल इंटरफेसचा वापर तसेच सायबर सुरक्षेतील कामांमध्येही एआय प्रणाली अधिक सक्षम होत आहेत. या वाढत्या क्षमतेमुळे त्यांचा गैरवापर झाल्यास परिणामांची व्याप्ती मोठी असू शकते, असा इशारा पाचोकी यांनी दिला.

‘एआय मानवांना फसवू किंवा ब्लॅकमेल करू शकते’

भविष्यातील अधिक स्वायत्त एआय प्रणाली स्वतःची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी माणसांशी वेगवेगळ्या प्रकारे संवाद साधू शकतात. त्यात वाटाघाटी करणे, फसवणूक करणे किंवा मानवांवर दबाव आणणे यांसारख्या पद्धतींचाही समावेश असू शकतो, असे पाचोकी यांनी नमूद केले आहे.

त्यांच्या मते, अत्यंत सक्षम एआय प्रणालींना विशिष्ट गैरकृत्य करण्यासाठी प्रशिक्षित केले गेले, तर त्या प्रणाली मानवी सूचनांच्या मूळ मर्यादेपलीकडे जाऊन अधिक गंभीर वर्तन करू शकतात. त्यामुळे एआयची क्षमता वाढत असताना त्याच वेगाने त्याची सुरक्षितता आणि मानवी नियंत्रणाच्या यंत्रणाही विकसित होणे आवश्यक आहे.

‘एआय विकासाला सुरक्षा मर्यादा आवश्यक’

एआयचा विकास कोणत्याही परिस्थितीत कमाल वेगाने सुरू ठेवणे योग्य नसल्याचे पाचोकी यांनी स्पष्ट केले. एआय प्रणालींच्या सुरक्षिततेबाबत पुरेसा विश्वास निर्माण होईपर्यंत त्यांच्या विकासावर काही प्रमाणात मर्यादा असणे आवश्यक आहे, असे त्यांनी सुचवले.

एआयच्या सुरक्षिततेसाठी केवळ कंपन्यांच्या अंतर्गत उपाययोजना पुरेशा ठरणार नाहीत. त्रयस्थ संस्थांकडून परीक्षण, सरकारी यंत्रणांचे नियमन आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील समन्वय यांसारख्या व्यापक उपायांची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पाचोकी यांच्या मते, एआयच्या विकासाला पूर्णपणे थांबवणे हा उपाय नाही; मात्र सुरक्षिततेबाबत पुरेसा विश्वास निर्माण होईपर्यंत विकासाचा वेग नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. भविष्यात अत्यंत सक्षम एआय अस्तित्वात आल्यास मानवांनी निर्णयप्रक्रियेवरील नियंत्रण कायम ठेवणे हे सर्वांत महत्त्वाचे आव्हान असेल, असे त्यांनी नमूद केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!