
मडगाव:
रवींद्र भवन, (ravindra Bhavan) मडगाव हे कला, संस्कृती आणि सामाजिक अभिव्यक्तीसाठीचे केंद्र असावे अशी अपेक्षा आहे. मात्र, बुकिंग प्रक्रियेत करण्यात आलेल्या बदलांमुळे पारदर्शकता आणि लोकशाही व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. आता प्रत्येक बुकिंगसाठी अध्यक्ष राजेंद्र तालक यांची वैयक्तिक मंजुरी आवश्यक आहे. ही पद्धत हुकूमशाहीचा दर्प सुटणारी आहे, अशी टीका राज्य सांस्कृतिक विकास समितीचे माजी सदस्य विशाल पै काकोडे यांनी केली आहे.
“पूर्वी सोपी, सर्वसामान्यांसाठी सुलभ असलेली ही प्रक्रिया आता एका व्यक्तीच्या हातात सत्ताकेंद्रित करणाऱ्या यंत्रणेत रूपांतरित झाली आहे,” असे पै काकोडे म्हणाले. “अध्यक्षांच्या हिरव्या कंदिलाशिवाय एकही कार्यक्रम पुढे जाऊ शकत नाही. एक सरकारी सांस्कृतिक संस्था आता एका व्यक्तीच्या मनमानीचा खेळ बनली आहे. हे प्रशासन नव्हे, तर छुपी हुकूमशाही आहे” असा आरोप विशाल पै काकोडे यांनी केला.
“तालक यांनी बदललेल्या प्रणालीचा मी ठामपणे निषेध करतो,” असे त्यांनी स्पष्ट केले. “परवानग्या प्रशासनाच्या ठराविक प्रक्रियेनुसारच द्याव्या लागतात, वैयक्तिक इच्छेवर नव्हे. ही अहंकाराधारित रचना त्वरित बरखास्त केली पाहिजे, आणि नवीन सदस्य सचिवांनी या सत्तेच्या गैरवापरावर रेड फ्लॅग दाखवला पाहिजे” अशी मागणी विशाल पै काकोडे यांनी केली आहे.
मडगाव रवींद्र भवनातील सत्ताकेंद्रित पद्धत केवळ सांस्कृतिक उपक्रमांमध्ये अडथळा आणत नाही, तर एका सार्वजनिक संस्थेच्या मूळ उद्दिष्टांनाही हरताळ फासते. कलाकार, आयोजक आणि सामान्य जनतेला पारदर्शक व कार्यक्षम व्यवस्था हवी आहे . एखाद्या व्यक्तीच्या मर्जीनुसार चालणारी नव्हे, असे पै काकोडे यांनी ठणकावून सांगितले.
“रवींद्र भवनमधील सार्वजनिक प्रवेश, प्रशासनिक उत्तरदायित्व आणि लोकशाही मूल्यांची पुनर्स्थापना करण्याची वेळ आली आहे,” असे विशाल पै काकोडे म्हणाले. “सत्तेची संस्कृती आता संपून, खुलेपणाची संस्कृती रुजवली पाहिजे, असे विशाल पै काकोडे म्हणाले.