
मडगावकरांचा विश्वासघात करुन भाजपात गेलेले आमदार दिगंबर कामत यांचा तथाकथित “मास्टर प्लॅन” हे मडगावच्या वारशाचा, लोकांचा आणि भविष्यातील पिढ्यांचा विश्वासघात आहे. नागरी सुधारणा या नावाखाली जुन्या इमारतींना जाणीवपूर्वक सडू दिलं जातंय, व्यापारी आणि कुटुंबांना हाकललं जातंय आणि दिल्लीतील बड्या कॉन्ट्रॅक्टर्स आणि बांधकाम माफियांना गगनचुंबी इमारती बांधायला संधी देण्याचा हा कुटील डाव आहे, असा आरोप मडगावचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी केला.
सिने लताजवळील इमारतीचा भाग कोसळल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना, गेल्या २४ तासांतली दुसरी अशी दुर्घटना असे सांगून, प्रभव नायक म्हणाले की ही परिस्थिती मडगावमध्ये सुरू असलेल्या बेजबाबदारपणा व दुर्लक्षाचं लक्षण आहे. जबाबदारी स्वीकारण्याऐवजी, मडगावचे पक्षबदलू आमदार इतरांवर बोट दाखवून कारणं शोधत बसले आहेत. ही नेतृत्वातील आणि जबाबदारीतील कुचराई शहराच्या अधोगतीला चालना देत आहे आणि बिल्डर लॉबींना फायदा करून देत आहे, असा दावा प्रभव नायक यांनी केला.
ही सुधारणा नाही, ही हळूहळू सुरू असलेली विनाशाची प्रक्रिया आहे. मडगावच्या खास सांस्कृतिक आणि स्थापत्यिक वारसा, हिरवी झाडं आणि समुदायाचा आत्मा असलेल्या जागा नष्ट होत चालल्या आहेत. टोपी फिरवून पक्ष बदललेल्या आमदार दिगंबर कामत यांची एकंदर वागणुक त्यांची निष्ठा आता मडगावकरांप्रती राहिलेली नाही, तर शहराला केवळ जमिनीच्या व्यवहारात बघणाऱ्या बिल्डर माफीया आणि क्रोनी भांडवलादारांच्या भल्यासाठी वळलेली आहे हे स्पष्ट करते, असे प्रभव नायक म्हणाले.
“रॉट टू प्लॉट आणि प्लॉट टू पोटलो” ही संकल्पना याच कटकारस्थानाचं सार सांगते. जुने घर सडू द्या, ती जागा विक्रीसाठी खुली करणे आणि शेवटी तिथे पर्यावरण, पायाभूत सुविधा आणि शहराच्या साधनसुवीधांकडे दुर्लक्ष करत गगनचुंबी इमारती उभारुन पोटलो (माया) कमवीणे हेच आता दिगंबर कामतांचे मास्टर प्लेनचे स्वप्न आहे, असा आरोप प्रभव नायक यांनी केला.
मडगांवचो आवाज आणि जागरूक युवक व नागरिकांचा पक्षबदलू दिगंबर कामतांच्या या मास्टर प्लॅनला स्पष्ट विरोध आहे. आम्ही मागणी करतो की शहराचा विकास लोककेंद्री असावा. वारसा जपणारा, सार्वजनिक सुविधा सुधारणारा आणि मडगावकर कुटुंबांना केंद्रस्थानी ठेवणारा मास्टर प्लॅन आम्हाला हवा. प्रत्येक मडगावकराने आता जागृत रहावे, आवाज उठवावा आणि आपल्या मडगावचे रक्षण करण्यास सज्ज रहावे. ही केवळ वाईट नियोजनाविरुद्धची लढाई नाही, ही मडगाव वाचवण्याची लढाई आहे, असं प्रभव नायक यांनी सांगितले.