![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2022/08/image_editor_output_image-481986534-1661074920792-780x470.jpg)
‘काँग्रेसला पर्याय नाही’
कुंकळ्ळी :
काँग्रेस पक्ष ही जनतेची चळवळ असून काँग्रेस पक्षाची जागा कोणीही घेऊ शकत नाही. काँग्रेस पक्षाने अनेकदा अनेक आव्हानांचा सामना केला आहे आणि त्यावर यशस्वीपणे मात केली आहे. काँग्रेसला पर्याय कधीच नसणार, असे कुंकळ्ळी गट काँग्रेसचे अध्यक्ष आसिस नोरोन्हा यांनी आज येथे जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
पणजीचे गत विधानसभा निवडणुकीतले काँग्रेसचे उमेदवार एल्विस गोम्स यांनी “देशातील लोकांनी काँग्रेस पक्षाला पर्याय शोधला आहे” अशा केलेल्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, कुंकळ्ळी गट काँग्रेस अध्यक्षानी “काँग्रेस आणि हाताचे चिन्ह लोकांच्या हृदयात आहे आणि कोणीही ते स्थान बदलू शकणार नाही” असे म्हटले आहे.
ओपिनियन पोल, गोव्याला घटक राज्य दर्जा, राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये कोकणी भाषेचा समावेश, प्रादेशिक आराखडा व एसईझेड रद्द करणे यांसारखे अनेक मैलाचा दगड ठरणारे निर्णय हे काँग्रेस सरकारांचे श्रेय आहे हे लोकांना चांगलेच ठाऊक आहे. आम्ही नेहमीच लोकांच्या भावना ऐकल्या आणि त्यांचा आदर केला, असे आसिस नोरोन्हा म्हणाले.
काँग्रेस पक्षातील सर्व नवोदितांना मी नम्रपणे आवाहन करतो की त्यांनी काँग्रेस पक्षाचा गौरवशाली इतिहास वाचावा. काँग्रेस पक्ष ही एक चळवळ आहे जी नेहमीच लोकशाही आणि गोव्याच्या अस्मितेच्या रक्षणासाठी लढली आहे, असा दावा आसिस नोरोन्हा यांनी केला.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी केवळ राजकीय फायदा घेण्यासाठी काही निहित घटकांनी पसरवलेल्या खोट्या कथनाने निराश होऊ नये. ज्यांच्याकडे जनाधार नाही असे तथाकथीत नेते कधीतरी खळबळजनक विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करतात. काँग्रेस पक्षाचे विरोधक मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी प्रत्यक्षात अप्रासंगिक मुद्दे उकरून काढण्याचा प्रयत्न करतात.कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी अशा कारस्थानाना बळी पडू नये अशी विनंती आसिस नोरोन्हा यांनी केली आहे.