![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2022/12/IMG-20221220-WA0056-780x470.jpg)
‘उदयनराजेंची प्रचारसभा ठरली निष्प्रभ’ ; शिवेंद्रसिंहराजे यांचा उदयनराजे यांना चिमटा…
सातारा (महेश पवार)
ग्रामपंचायत निवडणुकीत सातारा- जावली मतदारसंघात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने निर्विवाद वर्चस्व राखत विरोधकांना धूळ चारली. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सातारा मतदारसंघातील निवडणूक झालेल्या १५ पैकी १४ तर, जावली तालुक्यातील १५ पैकी १४ ग्रामपंचातींवर सत्ता मिळवून आ. शिवेंद्रसिंहराजे गटाने आपला करिष्मा अबाधित ठेवला आहे.
जावली तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. यातील केवळ मोरघर ग्रामपंचायत वगळता बाकीच्या १४ ग्रामपंचायतींवर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाने आपली सत्ता स्थापन केली आहे. रामवाडी, केळघर, रिटकवली, वाकी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. या ग्रामपंचायतींवरही आमदार गटाने एकहाती वर्चस्व राखले. दरम्यान, निवडणूक झालेल्या रुईघर, वालुथ, करहर, ओझरे, घोटेघर, भोगवली तर्फ कुडाळ, शिंदेवाडी, आखाडे, कुसूंबी, सोमर्डी या ग्रामपंचायतींवरही आ. शिवेंद्रसिंहराजे गटाने विजय मिळवून विरोधकांना पाणी पाजले.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातारा मतदारसंघात १५ ग्रामपंचायतींचा निवडणूक कर्यक्रम लागला होता. यातील सोनगाव तर्फ सातारा, भरतगाववाडी, आंबवडे खुर्द, भोंडवडे या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून या चारही ग्रामपंचायतींवर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाने सत्ता मिळवली आहे. निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये साबळेवाडी वगळता बाकीच्या १० ग्रामपंचायतींवर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवले. यामध्ये राजापुरी, केळवली- सांडवली, करंजे तर्फ परळी, आसनगाव, बेंडवाडी, जकातवाडी, शहापूर, कोंडवली, माळ्याची वाडी, गोगावलेवाडी आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सातारा तालुक्यात एकूण २९ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. हाती आलेल्या निकालानुसार बहुतौन्श सर्वच ग्रामपंचायतींवर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाने सत्ता मिळवली आहे.
![shivendraraje-udayanraje](https://rashtramat.com/wp-content/uploads/2022/11/shivendraraje-udayanraje.jpg)
उदयनराजेंची प्रचारसभा ठरली निष्प्रभ :
सातारा तालुक्यातील आसनगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वतः प्रचारसभा घेतल्यामुळे हि निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. हि लढत चुरशीची आणि लक्षवेधी होणार असा कयास बांधण्यात येत होता. त्यामुळे आसनगावच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र आ. शिवेंद्रसिंहराजे गटाने खासदार उदयनराजे गटाला धूळ चारून सत्ता अबाधित राखली. स्वतः खासदार प्रचारात सक्रिय होऊनही खासदार गटाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले, त्यामुळे आमदार गटाने खासदार गटाला जोरदार धक्का दिल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.