
ISRO YUVIKA 2025 : गोमंतकीय विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व आणि प्रशिक्षणावर ‘प्रभावी’ सवाल
मडगाव :
भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) च्या प्रतिष्ठित ‘युविका २०२५’ प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झालेल्या ३५० विद्यार्थ्यांची यादी नुकतीच जाहीर झाली असून, त्यामध्ये केवळ १० विद्यार्थी गोव्यातून आहेत. विशेष म्हणजे, यापैकी फक्त ४ विद्यार्थ्यांची नावे गोमंतकीय वाटतात, ही बाब अत्यंत गंभीर असून स्थानिक प्रतिनिधित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करते, असे मडगावचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी म्हटले आहे.
युविका प्रशिक्षणासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो व त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो, असे प्रभव नायक म्हणाले.
युविका कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा निर्माण करण्यासाठी राबवला जातो आणि भविष्यातील विज्ञान व तंत्रज्ञानाच्या संधींसाठी एक प्रवेशद्वार मानला जातो. गोव्यातील अल्प प्रतिनिधित्व पाहता, स्थानिक विद्यार्थ्यांना अशा राष्ट्रीय स्तरावरील संधींबाबत योग्य माहिती, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळते आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. गोव्यासारख्या लहान राज्यांपर्यंत अशा कार्यक्रमांची पोहोच मर्यादितच आहे का, हाही गंभीर विचार करण्याचा मुद्दा आहे, असे प्रभव नायक यांनी नमूद केले.
“गोवा सरकारने अशा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक कार्यक्रमांसाठी गोमंतकीय विद्यार्थ्यांची निवड, प्रशिक्षण व तयारी करण्यासाठी नेमकी कोणती ठोस पावले उचलली आहेत?” असा सवाल प्रभव नायक यांनी उपस्थित केला. “सरकार स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सरकारी प्रशिक्षण योजना राबवीत असल्याचे सांगते, पण युविका २०२५ ची यादी पाहता त्या योजनांचे प्रत्यक्ष परिणाम दिसत नाहीत,” अशी टीका प्रभव नायक यांनी केली.
शिक्षण संचालनालय व इतर संबंधित यंत्रणांनी गोमंतकीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर समान संधी मिळवून देण्यासाठी कोणती धोरणं आणि यंत्रणा राबवली जात आहेत, यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी प्रभव नायक यांनी केली. ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांपर्यंत या संधी पोहोचतात का? सरकारी शाळांमध्ये अशा कार्यक्रमांची माहिती दिली जाते का? हे सर्व प्रश्न आता दुर्लक्षित करता येणार नाहीत, असे प्रभव नायक म्हणाले.
मडगावचो आवाज व संबंधित जागरूक नागरिकांच्या वतीने, आम्ही गोवा सरकारला आवाहन करतो की त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या योजनांचा आढावा घ्यावा, संधींचा लाभ कोणाला आणि कसा मिळाला याची माहिती जाहीर करावी, आणि स्थानिक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण व प्रोत्साहन मिळावे यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात. गोव्याच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या भविष्यासाठी उत्तरदायित्वाची गरज आहे, असे प्रभव नायक यांनी सांगितले.