
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी एनएसयूआयने केली ‘हि’ मागणी
पणजी : अंतिम वर्षातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा सुरू करण्याची मागणी एनएसयूआय-गोवाने गोवा विद्यापीठाकडे केली आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या कुलसचिवांना निवेदन सादर करण्यात आले असून, या प्रस्तावावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन विद्यापीठाने दिले आहे.
एनएसयूआयने म्हटले आहे की, प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना एटीकेटी आणि पुरवणी परीक्षेची सुविधा उपलब्ध असताना अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी अशी तरतूद नाही. त्यामुळे एका विषयात नापास झाल्यास विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्यासाठी संपूर्ण एक शैक्षणिक वर्ष प्रतीक्षा करावी लागते. याचा परिणाम उच्च शिक्षण, नोकरीच्या संधी आणि विद्यार्थ्यांच्या आर्थिक व मानसिक स्थितीवर होत असल्याचे संघटनेने नमूद केले.
संघटनेने विद्यापीठाच्या अध्यादेशात दुरुस्ती करून अंतिम वर्षासाठी पुरवणी परीक्षा सुरू करावी, निकालानंतर वाजवी कालावधीत परीक्षा घ्यावी आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तातडीने तात्पुरते व पदवी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी केली आहे.
यावर गोवा विद्यापीठाच्या कुलसचिवांनी हा प्रस्ताव संबंधित सक्षम प्राधिकरणाच्या पुढील बैठकीत विचारार्थ मांडला जाईल, असे सांगितले. या आश्वासनाचे स्वागत करत एनएसयूआयने विद्यार्थ्यांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.






