
चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तमिळगा वेत्री कळघम (TVK)चे आमदार एन. इलैयाराजा यांनी आपल्याला विधानसभा अध्यक्षांविरोधातील ठरावावर मतदानाचा निर्णय बदलण्यासाठी तब्बल ३५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, माजी मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांचे नावही आरोपांमध्ये समोर आले आहे.
इलैयाराजा यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात सरकार अस्थिर करण्यासाठी आमदारांना प्रलोभने देण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, या आरोपांवरून राज्यात सत्ताधारी TVK आणि विरोधी DMK यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. TVKने या कथित कटामागे सेंथिल बालाजी यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे DMKने हे आरोप फेटाळून लावत मुख्यमंत्री विजय आणि एमडीएमकेचे नेते वायको यांनीच DMKच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा पलटवार केला आहे.
-
‘वंदे मातरम्’वरून काँग्रेसवर विजययन यांचा निशाणाAugust 15, 2026
-
‘वंदे मातरम्’ला कायदेशीर संरक्षण; राष्ट्रगीतासोबत गायन बंधनकारकAugust 11, 2026
अलीकडेच DMKचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी विजय सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल की नाही, याबाबत शंका व्यक्त करत कार्यकर्त्यांना संभाव्य निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर घडलेल्या या घटनांमुळे तामिळनाडूतील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.






