
दिल्लीत ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे भव्य आंदोलन
विविध शैक्षणिक आणि भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहार तसेच पेपरफुटीच्या घटनांविरोधात देशभरातील विद्यार्थी आणि तरुणांमध्ये वाढत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर मंतर येथे मोठे आंदोलन आयोजित करण्यात आले. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजित दिपके यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हजारो विद्यार्थी आणि तरुण या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आंदोलनाला संबोधित करताना अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. “गेल्या महिनाभरापासून आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. मात्र, या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी आमची सोशल मीडिया खाती हॅक करण्याचा आणि पोस्ट हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोस्ट हटवता येतील, पण आमचा आवाज दाबता येणार नाही,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील साहित्य दिसून आले. या आंदोलनासंदर्भातील वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ने प्रसिद्ध केले आहे.
आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या
१. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा
नीट पेपरफुटी प्रकरण आणि सीबीएसईच्या ‘ऑन स्क्रीन मार्किंग सिस्टीम’मधील कथित अनियमिततेची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा.
२. प्रशिक्षणाविना डिजिटल शिक्षण प्रणाली लागू करू नये
शिक्षण क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यापूर्वी शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच डिजिटल व्यवस्थेमुळे उद्भवणाऱ्या त्रुटी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात.
३. मणिपूरमधील शिक्षण व्यवस्था सुरळीत करावी
गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे मणिपूरमधील शैक्षणिक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी करून तेथील शाळा आणि महाविद्यालये पूर्ववत सुरू करण्यासाठी तातडीची पावले उचलावीत.
४. स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता वाढवावी
लाखो विद्यार्थी अनेक वर्षे कठोर परिश्रम करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र, पेपरफुटी आणि गैरव्यवहारांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करावी.
५. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे
परीक्षांशी संबंधित गोंधळ आणि अनिश्चिततेमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढत आहे. काही विद्यार्थ्यांनी टोकाची पावले उचलल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत प्रशासनाने अधिक उत्तरदायित्व स्वीकारावे.
या आंदोलनात शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी, पालक तसेच विविध क्षेत्रांतील तरुण व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक आंदोलकांनी चेहऱ्यावर झुरळांचे मास्क परिधान केले होते, तर हातात फुले घेऊन शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन केले.
आंदोलनादरम्यान “धर्मेंद्र प्रधान, राजीनामा द्या” आणि “जय भीम” अशा घोषणा देण्यात आल्या. सोशल मीडियावर सुरू झालेली ही मोहीम प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्याने शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांबाबत केंद्र सरकारवरील दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





