![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2022/11/IMG-20221122-WA0008-780x470.jpg)
‘तंत्रज्ञानशरण सिनेनिर्मितीचा अट्टाहास टाळा!’
पणजी (किशोर अर्जुन) :
सिनेमा ही तंत्रज्ञानाने जन्माला घातलेली कला आहे. या क्षेत्रात सातत्याने नवनवे प्रयोग आणि बदल होत असतात. त्यामुळे प्रत्येक पुढच्या पिढीतील सिनेकर्मीना सिनेनिर्मिती सोपी होऊन जाते. असे असले तरी, सिनेमा ही कलात्मक, सृजनात्मक निर्मिती देखील आहे हे विसरता कामा नये आणि त्यामुळेच नव्या सिनेकर्मीनी तंत्रज्ञानाची कास धरताना कलात्मक बाजूदेखील तेवढीच सक्षमपणे सांभाळली पाहिजे. केवळ तंत्रज्ञानशरण सिनेनिर्मीती होता कामा नये, असे स्वच्छ मत प्रसिद्ध दिग्दर्शक आणि यावर्षीच्या इफ्फी – इंडियन पॅनोरमाचे अध्यक्ष विनोद गणात्रा यांनी ‘गोमंतक’कडे व्यक्त केले.
सुरुवातीच्या काळात रोलवर सिनेमा चित्रीत होत होते. त्यामुळे सिनेकर्मी आपल्या कलाकृतीबद्दल अधिक सजग होते. सिनेमाच्या पटकथेवर खूप अभ्यासपूर्ण काम होत असे. सिनेमात डिजिटल युग अवतरल्यानंतरही हा अभ्यास तसाच राहणे अपेक्षित होता आणि कथेच्या अनुषंगाने अधिक सकस सिनेमा प्रेक्षकांसमोर येणे गरजेचे होते पण अपवाद वगळता बहुतांश तरुण सिनेकर्मी तंत्रग्यानासमोर शरणागती पत्करताना दिसत आहेत. विचार करून, पटकथेवर अभ्यास करून गरजेपुरतेच चित्रीकरण करण्यापेक्षा डिजिटल कॅमेरा असल्याने भरमसाठ चित्रीकरण करतात आणि त्यामुळे संकलनावर त्याचा ताण तर येतोच पण त्याचवेळी ही सम्पूर्ण प्रक्रिया दिग्दर्शकाचा सिनेमाबद्दलचा दृष्टिकोन अप्रत्यक्षरीत्या दाखवत असते, असेही थेट निरीक्षण विनोद गणात्रा यांनी यावेळी नोंदवले.
‘छोट्या भाषेतील सिनेमांना मिळावा लोकाश्रय’
भारत हा बहुभाषिक बहुप्रांतीक आणि बहुविध संस्कृतीने नटलेला देश आहे. आपल्याकडे विविध भाषांमधून मोठ्या प्रमाणात सिनेनिर्मिती सध्या सुरू आहे. या सिनेमांना आपण सर्वतोपरी सहकार्य करणे गरजेचे आहे. विविध छोट्या छोट्या भाषांमध्ये जे सिनेमाचे प्रयत्न होत आहेत त्यांच्या मागे प्रेक्षकांनी सक्षमपणे उभे राहिले पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे l देशातील प्रत्येक भाषेमध्ये सिनेमा व्हावा. प्रत्येक भाषेला सिनेमाच्या पडद्यावर स्वतःचे स्थान मिळावे यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. भारतीय म्हणून आपण या नव्या सिनेमाला पुढे घेऊन आले पाहिजे, असेही विनोद गणत्रा यांनी यावेळी नमूद केले.
गोव्यातील कोंकणी सिनेमा हा आशयघन आहे. यावर्षी गोवन विभागाचे परीक्षण देखील आम्ही केले होते. छोट्या छोट्या विषयावरती अत्यंत चांगले प्रयत्न गोव्यातल्या या नव्या लघुपट्कारानी केलेले आहेत, त्यांच्या या प्रयत्नांना सरकारने आणि प्रेक्षकांनी देखील पाठिंबा दिला पाहिजे. असेही त्यांनी आवर्जून सांगितले.