![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230721-WA0014-780x470.jpg)
पणजी :
मणिपूरच्या मुद्द्यावर भाजप सरकारच्या मौनाचा निषेध करत गोव्यातील युवक काँग्रेसच्या सदस्यांनी आणि इतर दक्ष लोकांनी शुक्रवारी निषेध केला आणि दोन महिलांची नग्नावस्थेत परेड केलेल्या घटनेचा निषेध केला.
पणजीतील आझाद मैदानावर एकत्र येवून युवक काँग्रेस आणि इतरांनी निषेध व्यक्त केला. गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत त्यांनी घोषणा दिल्या.
गोवा युवक काँग्रेसचे अध्यक्ष जोएल आंद्राद्र म्हणाले, “मणिपूरचे लोक 70 दिवसांपासून त्रस्त आहेत. गुन्हेगारांनी भाजप सरकारच्या पाठिंब्याने चर्च जाळल्या, जमावाने महिलांवर अत्याचार केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कडून आम्हाला केवळ एका घटनेवर नाही तर मागील ८० दिवसात मणिपूर मध्ये जे घडले आहे त्यावर विस्तृत विधानाची अपेक्षा आहे. आम्ही मणिपूरच्या लोकांसोबत एकजुटीने उभे आहोत. शांतता हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे.”
अहराज मुल्ला म्हणाले की, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मणिपूर प्रकरणावर गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करावी. ‘‘मणिपूर प्रकरणाला भाजप सरकार जबाबदार आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,” असे ते म्हणाले.
![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2023/07/img-20230721-wa0013797091872954118479-1024x682.jpg)
वरद म्हार्दोळकर यांनी मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध केला. ‘भाजप सरकार असंवेदनशील आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना इतर देशांचा दौरा करायला वेळ आहे, पण मणिपूरच्या मुद्द्यावर बोलायला त्यांना वेळ नाही. ‘बेठी पढाओ, बेठी बचाओ’ या योजनेत भाजप अपयशी ठरला आहे. लोकशाही कोसळली आहे. जात आणि धर्मावरून देशात फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असे म्हार्दोळकर म्हणाले.
ते म्हणाले की, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. “परिस्थितीवर नियंत्रण नाही. मणिपूरच्या मुद्द्यावर प्रधानमंत्री अपयशी ठरले आहेत,” असे ते म्हणाले.
विजय भिके म्हणाले की, मणिपूरची परिस्थिती पूर्णपणे कोलमडली आहे आणि याला भाजप सरकार जबाबदार आहे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. “मणिपूरमध्ये आमच्या बहिणींना अशी वागणूक दिली जाते हे लज्जास्पद आहे. महिलांना नग्नावस्थेत फिरण्यास भाग पाडण्याची घटना निषेधार्ह आहे,” असे ते म्हणाले.
सिसिल रॉड्रिग्स म्हणाल्या, “दोन दिवसांपूर्वी प्रसारित झालेला व्हिडिओ चिंताजनक आहे. आपल्या देशात जन्मलेल्या आणि वाढलेल्या सर्व महिलांसाठी ही निराशाजनक आहे. आज हे मणिपूरमध्ये घडले, उद्या गोव्यातही घडू शकते. अशावेळी लोक मौन राखून बघत राहणार का,”
शेफान शेख, अरविंद नंदा, रीना लोपेझ आणि ताहिया पिंटो या कार्यक्रमात सहभागी झाले. तसेच अनेक नागरीकही उपस्थित होते.
![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2023/07/img-20230721-wa00156509633093216274377-1024x682.jpg)
घटनेच्या निषेधार्थ महिलेने केले मुंडण
मणिपूरच्या हिंसाचाराच्या विरोधात, विशेषत: महिलांचे नग्न परेड केल्याच्या निषेधार्थ दक्षिण गोव्यातील एका महिलेने तिच्या डोक्याचे मुंडण केले.
“मी हे माझ्या इच्छेने करत आहे, आणि कोणीही माझ्यावर हे करण्यास भाग पाडले नाही. मणिपूरमधील परिस्थिती भयानक आहे. मी प्रार्थना करते की ती लवकर सुधारेल.” असे ती म्हणाली.