
‘महान गोमंतकीयांची जन्मशताब्दी साजरी करावी’
मडगाव :
भारताचे लाडके व्यंगचित्रकार, पद्मविभूषण मारियो मिरांडा यांच्या १०० व्या वर्षात आपण प्रवेश करत असताना, सरकारने नामवंत गोमंतकीयांची शताब्दी साजरी करण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज आहे. राष्ट्रीय स्तरावर आदरांजली, प्रदर्शने, आणि स्मारकासह त्यांची जन्मशताब्दी साजरी करणे अशा महान गोमंतकीयांना खरी मानवंदना ठरेल, असे मडगावचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी म्हटले आहे.
महान गोमंतकीय व्यंगचित्रकार मारिया मिरांडा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सुरुवातीला त्यांचे स्मरण करत, प्रभव नायक यांनी सरकारला विवीध क्षेत्रात योगदान दिलेल्या गोमंतकीयांची सध्या चालू असेलेली जन्मशताब्दी तसेच आगामी जन्मशताब्दी वर्षात कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून त्यांची ओळख नवीन पिढ्यांना होईल आणि त्यांच्या समृद्ध योगदानाचे स्मरणही करता येईल.
आपली संस्कृती, इतिहास आणि अस्मितेसाठी महान गोमंतकीयांच्या कायमस्वरूपी योगदानाचा सन्मान करण्यासाठी सरकारने महान गोमंतकीयांचे जन्मशताब्दी उत्सव साजरे करण्यासाठी निधी देण्यास प्राधान्य दिले पाहिजे. साहित्य, राजकारण, विज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात त्यांच्या कार्याद्वारे या व्यक्तींनी गोव्याचा वारसा घडवला आहे, असे प्रभव नायक म्हणाले.
अनेक सरकारी कार्यक्रमांवर सरकार वायफळ खर्च करते परंतु सदर कार्यक्रमांतून समाजावर कायमस्वरूपी प्रभाव पडत नाही. सरकारने योग्य निधी वापरुन महान गोमंतकीयांच्या स्मृतीना उजाळा दिल्यास ते समाजासाठी आणि नवीन पिढीसाठी मोठे योगदान ठरणार आहे. जन्मशताब्दी उत्सवांना शैक्षणिक मूल्य असते आणि ते दोन पिढ्यांना एकत्र आणण्याचे काम करू शकतात. आपला इतिहास व तो घडविणाऱ्यांची ओळख सदर उस्तव युवा पिढीला करून देतात, असे प्रभव नायक म्हणाले.
जन्मशताब्दी कार्यक्रम सांस्कृतिक वारसा जागवतात. जेव्हा एखादा समाज आपल्यासाठी योगदान दिलेल्यांची आठवण करुन प्रदर्शने, माहितीपट, शालेय कार्यक्रम तसेच स्मारकांची निर्मिती करतो तेव्हा सदर उपक्रमांतून इतिहास घडविणाऱ्या महान गोमंतकीयांप्रती आदर व्यक्त करण्याची व त्यांचे योगदान समजून घेण्याची संधी खास करुन युवा पिढीला मिळते, असा दावा प्रभव नायक यांनी केला.
यंदाच्या वर्षी मडगाव शहरात जन्मलेले चित्रकार पद्मभूषण लक्ष्मण पै तसेच सिनेमाटोग्राफर के. वैकुंठ तथा वैकुंठ कुंकळयेकर यांची जन्मशताब्दी असून, सरकारने त्यांची जन्मशताब्दी साजरी करावी अशी मागणी मी या अगोदरच केली आहे, असे प्रभव नायक यांनी सांगितले.
केवळ स्मारके तयार करणे वा कलाकृतींचे जतन करणे यातून आपला वारसा जतन होतोच पण त्याही पलिकडे त्यासाठी योगदान दिलेल्यांच्या स्मृती जींवत राहतात. आपल्या महान गोमंतकीयांच्या स्मृती जपणे हे सरकारचे कर्तव्य आहे असे प्रभव नायक म्हणाले.
केवळ स्मारके तयार करणे वा कलाकृतींचे जतन करणे यातून आपला वारसा जतन होतोच पण त्याही पलिकडे त्यासाठी योगदान दिलेल्यांच्या स्मृती जींवत राहतात. आपल्या महान गोमंतकीयांच्या स्मृती जपणे हे सरकारचे कर्तव्य आहे असे प्रभव नायक म्हणाले.