![goa-congress-plan-to-introduce-inheritance-tax-vinod-tawde](https://rashtramat.com/wp-content/uploads/2024/04/vinod-tawade-780x470.jpg.webp)
वारसा कर लागू करण्याचा काँग्रेसचा डाव : विनोद तावडे
पणजी, एकीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी जनतेच्या मनात भीती निर्माण करत आहेत की, राज्यघटनेत बदल करण्यासाठी भाजपला ४०० पार जागा हव्या आहेत. तर, दुसरीकडे त्यांचेच नेते गोव्याला विशेष दर्जा मिळावा यासाठी राहुल गांधी यांच्या परवानगीने घटनेत बदल करणार असल्याचे सांगत आहेत.
एकीकडे कुटुंबप्रमुखाच्या निधानानंतर त्याच्या संपत्तीचा मोठा वाटा शासनाकडे जमा करण्यासाठी काँग्रेस वारसा कर लागू करण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे मोदी सरकार ठोस योजना राबवून ही रक्कम थेट लाभार्थींच्या खात्यात वळवत आहे, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यावेळी भंडारा मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी देऊन पराभूत करण्याचे काम काँग्रेसने साधले. तर, भाजपने १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंती दिवशी राज्य घटनेची प्रत समोर ठेवून आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, असे तावडे म्हणाले.
काँग्रेसचा डोळा आमच्या-तुमच्या वाडवडिलांच्या संपत्तीवर, पैशांवर असल्यानेच वारसा कर लादण्याचा विचार केला जात आहे. हे पैसे कोणाला मिळणार याचे संकेत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी दिलेले आहे. यातून काँग्रेस पक्ष काय करू शकतो यांचा अंदाज येऊ शकतो.
उलट भाजप सरकारने ‘आयुष्मान’ कार्डाच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा, जलजीवन मिशनतर्फे १०० टक्के घरांना पाणी, स्टार्ट-अप, पीएम उज्ज्वला योजनेद्वारे १० लाख एलईडी बल्ब, मातृवंदना, स्वच्छ भारत, किसान सन्मान योजनेखाली ६ हजार रुपये अशा अनेक माध्यमांतून जनतेला आर्थिक साहाय्य केलेले आहे, असेही तावडे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मुद्देच नसल्याने विरोधक फसतात. राज्य घटनेविषयी गोव्यातील उमेदवाराने केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधी काहीच प्रतिक्रिया देत नाहीत. कारण ती काँग्रेसची नीती आहे, असा आरोप करून तावडे म्हणाले, सध्या दक्षिण भारतात तामिळनाडू, केरळमध्ये भाजप बऱ्यापैकी जागा जिंकणार अशी चिन्हे आहेत. गोव्यातील दोन्ही जागा जिंकल्यास त्याचे श्रेय राष्ट्रीय आणि स्थानिक नेतृत्वच नव्हे तर मोदी म्हणतात त्याप्रमाणे बूथवरील प्रत्येक कार्यकर्त्याचे असेल, असे तावडे म्हणाले.
अद्याप नेता न ठरलेल्या नेतृत्वहीन अशा ‘इंडिया’ आघाडीकडे आपल्याला देशाची सत्ता सोपवायची आहे की भक्कम, सशक्त, विकसित भारताचे स्वप्न पाहणाऱ्या कणखर नेत्याला परत एकदा पंतप्रधान बनवायचे आहे, याचा निर्णय जनतेने घेतला पाहिजे. असेही तावडे यांनी सांगितले.