![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2023/03/Supriya_Sule_Baramati__4_-780x470.jpg)
कसब्यात रवींद्र धंगेकरांचा विक्रमी विजय
गेल्या महिन्याभरापासूवन राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये मविआचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेलाा हा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. रवींद्र धंगेकरांच्या रुपाने महाविकास आघाडीला भाजपावर मोठा विजय मिळाल्याचं दिसून येत आहे. रवींद्र धंगेकरांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा तब्बल ११ हजार ०४० मतांनी पराभव केला आहे.
कसब्यामध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर तिथे पोटनिवडणुका लागल्या. या निवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली जात होती. खुद्द टिळक कुटुंबातूनही तशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, त्याऐवजी भाजपाकडून माजी आमदार हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यामुळे कसब्यात भाजपाविरोधी नाराजी असल्याचं सांगितलं जात होतं. अखेर आज मतमोजणीनंतर ही नाराजी निकालाच्या रुपाने दिसून आल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, मुक्ता टिळक यांच्या घरात उमेदवारी न दिल्यामुळे ब्राह्मण समाज भाजपावर नाराज असल्याचं बोललं जात होतं. ब्राह्मण समाजाला उमेदवारी दिली नसल्याचं सांगत हिंदू महासभेचे आनंद दवे यांनीही नाराजी व्यक्त करत निवडणुकीत उमेदवारी जाहीर केली होती. त्यांच्या उमेदवारी अर्जामुळे निवडणुकीत रंगत निर्माण झाली. आनंद दवेंनी या निवडणुकीत मोठ्या मुश्किलीने शंभर मतांचा आकडा पार केला असला, तरी त्यांच्या रुपाने ब्राह्मण समाजाची नाराजी वाढण्यास हातभार लागल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, तब्बल २८ वर्षांनंतर कसब्यामध्ये आमदारकी भाजपाकडून काँग्रेसकडे आली आहे. याआधी १९९२ च्या निवडणुकीत कसब्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. २००९ मध्येही कसब्यामध्ये रवींद्र धंगेकरांनी गिरीश बापट यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना विजय मिळवण्यात अपयश आलं. यंदाच्या निवडणुकीत भाजपाविरोधी असणारी नाराजी रवींद्र धंगेकरांच्या पथ्यावर पडल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.