पणजी : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी कारापूर येथे प्रस्तावित लोढा मेगा प्रकल्पाविरोधातील ‘सेव्ह करापूर’ आंदोलनात शनिवारी सहभाग घेतला. राज्यात आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यास गोवा टाउन अँड कंट्री प्लॅनिंग कायद्यातील कलम ३९अ रद्द करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
केजरीवाल यांच्यासमवेत दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री तथा गोवा प्रभारी अतिशी, गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, वेलीमचे आमदार क्रूझ सिल्वा तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला.
यावेळी बोलताना केजरीवाल यांनी भाजप सरकारवर जनविरोधी प्रकल्पांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला. राज्यातील जमीन, पर्यावरण आणि स्थानिक हितांना बाधा पोहोचविणाऱ्या धोरणांविरोधात नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाल्यास कलम ३९अ रद्द करणे हे प्राधान्याचे काम असेल, असे सांगत या तरतुदीअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सर्व मेगा प्रकल्पांचा पुनर्विचार करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले. तसेच अशा प्रकल्पांच्या मंजुरी मागे घेण्याची कारवाई केली जाईल, असा दावा त्यांनी केला.
या आंदोलनात पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष संदेश तेलीकर-देसाई, कार्याध्यक्ष गर्सन गोम्स, संघटन सचिव प्रशांत नाईक, उपाध्यक्ष सुनील सिंगणपूरकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.



