
भाजप सरकार लवकरच नागरिकांना कमी पाणी प्या, कमी श्वास घ्या आणि घराबाहेर कमी पडा असा सल्ला देईल : प्रभव नायक
मडगाव: भाजप सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देश आर्थिक संकट, परकीय चलन ताण आणि ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेकडे ढकलला जात आहे. अशीच परिस्थिती राहिली तर सरकार लवकरच नागरिकांना कमी पाणी प्या, कमी श्वास घ्या आणि घराबाहेर पडणेही कमी करा असा सल्ला देईल, असे मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी म्हटले आहे.
प्रभव नायक म्हणाले की, म्हादई पाणी प्रश्न हाताळण्याची गोवा सरकारची पद्धत राज्याच्या जलसुरक्षेलाच धोका निर्माण करणारी ठरत आहे. धरणांतील घटणारी पाण्याची पातळी आणि आटत चाललेल्या नद्या ही गंभीर बाब बनली आहे. त्यांनी आरोप केला की, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यात सरकारचे अपयश गोव्याला “गुन्हेगारीची राजधानी” बनवत आहे, तर गोव्याला कोळसा वाहतुकीचे केंद्र बनवण्याचे प्रयत्न गोमंतकियांच्या आरोग्य, पर्यावरण आणि भविष्यासाठी घातक ठरणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केलेले आवाहन सर्वप्रथम गोवा सरकारने स्वतःवर लागू करावे. सामान्य नागरिकांवर काटकसरीचे ओझे टाकताना सत्ताधारी मात्र ऐषआरामात राहतात, हे योग्य नाही. देशातील नागरिक आधीच महागाई, बेरोजगारी, असुरक्षितता आणि आर्थिक अनिश्चिततेने त्रस्त आहेत, असेही त्यांनी म्हटले.
प्रभव नायक यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे गाड्यांचे ताफे, आलिशान गाड्या, मोठे इव्हेंट, प्रसिद्धीवरील उधळपट्टी आणि परदेश दौरे यावरील अनावश्यक खर्च तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली. “पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देताना गोवा सरकारने प्रथम कृती आणि जबाबदारी दाखवावी,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, नागरिकांना सतत त्याग करा, संसाधने वाचवा आणि अडचणी सहन करा असे सांगितले जात असताना सरकार मात्र करदात्यांच्या पैशांवर उधळपट्टी करत राहू शकत नाही. तात्काळ सुधारणा केल्या नाहीत तर सत्ताधारी आणि सामान्य जनता यांच्यातील दरी अधिक वाढेल आणि लोकांचा संस्थांवरील विश्वास आणखी ढासळेल. “काटकसरीची सुरुवात वरपासून झाली पाहिजे; ती फक्त सामान्य लोकांवर लादली जाऊ नये,” असे प्रभव नायक यांनी शेवटी म्हटले.

