महाराष्ट्र

‘आदेश देणाऱ्यांवर कारवाई का नाही?’

विद्यार्थ्यांवरील लाठीमार प्रकरणी राज ठाकरे आक्रमक

मुंबई : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या लाठीमारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांबरोबरच त्यांना तसे आदेश देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी २० जुलै रोजी संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान दिल्ली पोलिसांनी आणि शीघ्र कृती दलाने (RAF) आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार केला होता. या घटनेवर सोशल मीडियावरील पोस्टद्वारे प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी, “शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली तर त्यांच्यावर कारवाई होते. मग विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर आणि त्यांना तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?” असा सवाल उपस्थित केला.

‘आदेशाशिवाय असे होऊ शकत नाही’

विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार हा केवळ गर्दी पांगविण्यासाठी नसून सूडबुद्धीने केल्यासारखा वाटत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. आंदोलनकर्त्यांसह परिसरातील इतरांनाही बेदम मारहाण झाल्याचे व्हिडीओ समोर आले असून, अशा प्रकारची कारवाई वरिष्ठांच्या आदेशाशिवाय होऊच शकत नाही, असे त्यांनी नमूद केले.

पोलिसांना वरिष्ठांच्या आदेशानुसार काम करावे लागते, त्यामुळे त्यांनाच पूर्णपणे दोषी ठरविता येणार नाही. मात्र, अशा कठोर कारवाईचे आदेश देणाऱ्यांना कोणता अधिकार आहे, ते संविधानापेक्षा मोठे आहेत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

परदेशातील उदाहरणांचा उल्लेख

नॉर्वे, जर्मनी, स्वीडन, फिनलंड, डेन्मार्क आणि न्यूझीलंडसारख्या देशांत पोलिसांकडून अशा प्रकारे बळाचा वापर झाल्यास त्याची कठोर चौकशी केली जाते. विशेषतः कारवाईचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाते. भारतातही अशीच पद्धत अवलंबली जावी, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

न्यायव्यवस्थेवरही टीका

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी न्यायव्यवस्थेवरही अप्रत्यक्ष टीका केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाशी संबंधित घडामोडींवर गंभीरपणे विचार होणे आवश्यक असल्याचे सांगत, यावर नागरी समाजाने पुढाकार घ्यावा, संसदेतही या विषयावर चर्चा व्हावी आणि लोकप्रतिनिधींनी यासाठी आग्रह धरावा, अशी मागणी त्यांनी केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!