google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘या’ प्रकरणावरून गिरीश चोडणकरांचे मुख्यमंत्र्याना दिले आव्हान


पणजी:

भाजप सरकारवर सतत दबाव आणत, माजी कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज एका कॅबिनेट मंत्र्याचा सहभाग असलेल्या पहिल्या जमीन हडप प्रकरणाचा खुलासा केला व सदर भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यास बडतर्फ करण्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आव्हान दिले. या बेकायदा जमीन प्रकरणाची चौकशी करून सदर “मास्टरमाइंड” मंत्री कोण हे शोधून काढण्याचे धाडस मुख्यमंत्र्यानी दाखवावी अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली.


या संदर्भात 20 जुलै 2022 रोजी पर्वरी पोलिस स्टेशनमध्ये या जमिनीची पॉवर ऑफ अॅटर्नी असलेले सेल्स फ्रान्सिस्को फर्नाडीस यांनी पोलिस तक्रार दाखल केली आहे. दक्षता विभाग आणि पंचायतीतही या संबधी तक्रार करण्यात आली होती, परंतु या तक्रारीची ना पोलिसांनी चौकशी केली ना ती एसआयटीकडे सोपवली, असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला आहे. तक्रारदाराने आता एसआयटीसमोर तक्रार दाखल केली आहे, असेही ते पुढे म्हणाले.



राजकीय दबावाखाली पोलिसांनी ही तक्रार दडपली आहे. निष्पाप गोमंतकीयांच्या जमिनी राजकीय संरक्षण घेऊन बळकावणाऱ्या मुंबईतील व्यावसायीकाने या भूखंडावर आधीच बांधकाम सुरू केले आहे अशी माहिती चोडणकर यांनी दिली.


“जर मुख्यमंत्री चौकशी करण्यास तयार नसतील तर मी एसआयटी तसेच साल्वादोर द मुंद पंचायतीकडे दुसरी तक्रार दाखल करण्यास तयार आहे. या तक्रारीत अँथनी मॅन्युएल रिबेलो आणि श्रीमती हेझल सेवेरिनो मेंडोन्सा यांच्या मालकीच्या ३२५० चौरस मीटर सर्व्हे क्रमांक २२१/२५ जमिनीचा संदर्भ आहे”, अशी माहिती गिरीश चोडणकर यांनी दिली.



एसआयटीला कारवाई करण्याची संधी देऊन मी आता काही काळ वाट पाहीन. जमीन बेकायदेशीरपणे बळकावण्याचे आणखी एक प्रकरण मी लवकरच उघडणार असून त्यात तेच मंत्री सामील असल्याचा इशारा गिरीश चोडणकर यांनी दिला आहे.



जमीन बळकावण्याच्या प्रकरणांचा एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा केवळ स्टंट असुन, या बेकायदा प्रकरणांत सहभागी असलेल्या राजकारण्याना सरकारी पदांवरुन काढण्याचे तसेच कॅबिनेट मंत्र्याला मंत्रिमंडळातून वगळण्याच्या माझ्या मागणीकडे मुख्यमंत्री डॉ. सावंत का लक्ष देत नाहीत असा सवाल चोडणकर यांनी केला.



गेल्या दोन महिन्यांपासून आपण ही मागणी सातत्याने करत आहोत, पहिली 25 जून रोजी करण्यात आली होती, त्यानंतर 7 आणि 21 ऑगस्ट रोजी त्याचा पुनरुच्चार करण्यात आला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली. दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगले आहे, असे गिरीश चोडणकर यांनी नमूद केले.

“मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे मौन म्हणजे ‘जमीन बळकावणाऱ्या’ सदर मंत्र्याला मोकळे सोडण्याचा मुख्यमंत्र्याचा इरादा स्पष्ट करते. मुख्य “मास्टरमाईंडस” ना सोडून केवळ इतरांची चौकशी करण्याचे नाटक भाजप सरकार करीत आहे. राजकीय दबावाखालीच एसआयटी चौकशी करीत असल्याचा दावा गिरीश चोडणकर यांनी केला. राजकीय वजन असलेल्या मंत्र्याला तसेच इतरांना बडतर्फ केले तरच लोक तक्रारी दाखल करण्यास पूढे येतील असे चोडणकर यांनी म्हटले आहे.



जमिन बळकाव प्रकरणांत सहभागी सर्व राजकीय व्यक्तींची नावें एसआयटीने ताबडतोब जाहिर करावीत अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!