![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230730-WA0010-780x470.jpg)
‘बाजार समिती व्यापारवृद्धीतून शेतकरी हित जोपासणार’
सातारा (महेश पवार) :
गेली अनेक वर्ष बंद झालेला जनावरांचा बाजार आज पुन्हा सुरु झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आणि खास करून पशु पालक शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. बाजार समितीच्या नवीन जागेत विकासरत्न अभयसिंहराजे भोसले उपबाजार उभारणीचे काम सुरु झाले असून याठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. सातारा बाजार समितीच्या माध्यमातून व्यापारवृद्धी होणार असून शेतकरी हित जोपासण्याला प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
कायदेशीर लढाई जिंकून बाजार समितीने खिंडवाडी येथील जागा मिळवली असून या ठिकाणी विकासरत्न अभयसिंहराजे भोसले उपबाजार विकसित करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. जागेच्या अभावी गेल्या अनेक वर्षांपासून जनावरे बाजार बंद होता. बाजार समितीकडे पुरेशी जागा उपलब्ध झाली असून शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि सोयीसाठी या ठिकाणी दर रविवारी जनावरांचा बाजार भरविण्याचा निर्णय घेण्यात आला.
रविवारी आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रमुख उपस्थितीत जनावरांच्या बाजाराचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, उप सभापती मधुकर पवार यांच्यासह सर्व संचालक, विविध मान्यवर आणि पशुपालक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनावरांचा व्यापार करणाऱ्या लोकांकडून अनेकदा शेतकऱ्यांची फसवणूक होत असते. शेतकऱ्यांना उच्च प्रतीची, जातिवंत जनावरे स्वतः पाहून, पसंत करून योग्य किमतीत खरेदी करता यावीत, तसेच इच्छुक शेतकऱ्यांना आपली जनावरे योग्य किमतीत विक्री करता यावीत यासाठी बाजार समितीच्या खिंडवाडी येथील विकासरत्न अभयसिंहराजे भोसले उपबाजार येथे आठवडा जनावरे बाजार सुरु करण्यात आला आहे. लवकरच याठिकाणी जनावरांचा दवाखाना सुरु करणार असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जाहीर केले. तसेच याठिकाणी लवकरच सुसज्ज आणि अद्यावत मार्केट यार्ड उभारून व्यापारी आणि शेतकऱ्यांची गैरसोय दूर केली जाणार असल्याचे ते म्हणाले.