
‘गोमातेच्या हत्येबद्दल राजीनामा देऊन वीजमंत्र्यानी प्रायश्चित घ्यावे’
पणजी :
वीज खात्याच्या निष्काळजीपणामुळे पर्वरी येथे गाय वीजेच्या धक्क्याने गाय मरण्याची धक्कादायक घटना घडली आहे. वीजमंत्री रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर यांनी गोमातेच्या हत्येसाठी बेजबाबदार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील अत्यंत असंवेदनशील भाजप सरकारच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा व प्रायश्चित घ्यावे अशी मागणी काँग्रेसचे माध्यम विभाग अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.
या घटनेने गोव्यातील जनता आणि प्राण्यांना सुरक्षा प्रदान करण्यात भाजप सरकारचे संपूर्ण अपयश उघड झाले आहे. निष्पाप गायीच्या हत्येमुळे भाजप सरकारला शाप लागेल, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.
गोवा वीज खाते केवळ गोव्यातील वीज दर वाढवण्यावर आणि सामान्य माणसावर बोजा टाकण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. वीजमंत्री रामकृष्ण ढवळीकर यांनी प्रथम कर्मचाऱ्यांसाठी तसेच लोकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यावर भर द्यावा, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.
भूतकाळात, विशेषतः पावसाळ्यात विजेच्या धक्क्याने लाईनमन आणि इतरांचे अनेक मृत्यू होऊनही, वीज खाते आपल्या कामगारांना सुरक्षा उपकरणे प्रदान करण्यात अपयशी ठरले आहे, असे अमरनाथ पणजीकर यांनी नमूद केले.
गोव्यात अनेक ठिकाणी वीज खात्याच्या ट्रान्सफॉर्मर, जंक्शन बॉक्सजवळ उघड्यावर वीजेच्या जिवंत तारा उघड्यावर आहेत. गायीच्या मृत्यूच्या घटनेने वीज खात्याचे अशा जिवंत तारांना झाकण्याचे अपयश समोर आले आहे असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.